दरम्यान, नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांच्या बाबतीत न्यायालयाने वेगळे निर्देश जारी केले आहेत. या दोन्ही ठिकाणी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असले तरी, न्यायालयाने वाढीव आरक्षणासह निवडणुका घेण्यास अंतरिम परवानगी दिल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
राज्यातील कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्थगित राहणार, याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरक्षणाचा टक्का ५० च्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्यामुळे ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना ठोस स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय अहिल्यानगर, जालना आणि बीड जिल्हा परिषदांनाही आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे तात्पुरता ब्रेक बसला आहे.
याउलट, ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत आहे, तेथील निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. याचबरोबर या जिल्ह्यांतील १२५ पंचायत समित्याही निवडणूक तयारीला लागल्या आहेत. त्यामुळे या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची चिन्हे आहेत आणि या निवडणुकांकडे राज्याचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत करत आहे.