Source: TV 9 Marathi
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा जरी झाली असली, तरी संपूर्ण राज्याचं लक्ष प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) निवडणुकीकडे लागलेलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सत्तासंघर्ष हा केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता, राज्याच्या राजकीय दिशेचं चित्र ठरवणारा मानला जात आहे. एकीकडे ठाकरे बंधू ‘मुंबई वाचवा, मुंबई वाचवा’ असा आक्रमक नारा देत मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे नेते मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा ठाम दावा करत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर बंडखोरी, नाराजी, मनधरणी आणि माघारी या सर्व टप्प्यांतून राजकीय पक्ष गेले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवारी, २ जानेवारी रोजी संपल्यानंतर अनेक बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली, तर काहींचे अर्ज अवैध ठरल्याने बाद झाले. या सर्व प्रक्रियेनंतर अखेर मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचा अंतिम आकडा स्पष्ट झाला आहे. आता एकूण सुमारे १७०० उमेदवार मुंबई महापालिकेसाठी निवडणूक लढवणार आहेत.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील महापालिका निवडणुकीसाठी एकूण २,२३१ वैध नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी १६७ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली, तर तब्बल ४५३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अखेरीस १७०० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राहिले आहेत. आज, शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.
दरम्यान, मुंबईतील या महासंग्रामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा झंझावात पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुंबईत सहापेक्षा अधिक जाहीर सभा नियोजित असून, विविध भागांमध्ये रोड शो देखील होणार आहेत. सभा आणि रॅलींसोबतच नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी टॉक शो, मान्यवरांच्या भेटीगाठी आणि जाहीर मुलाखतींवर भर दिला जाणार आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील प्रचाराची सुरुवात होण्यापूर्वी आज वरळीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संयुक्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबईसोबतच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ प्रभाग समित्यांमधून एकूण १,१०७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. त्यापैकी २६९ उमेदवारांनी १ आणि २ जानेवारी रोजी माघार घेतली. त्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ६४९ उमेदवार रिंगणात आहेत. आज ३ जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी बिनविरोध निवडींची आकडेवारीही समोर आली आहे. कल्याणमध्ये भाजपचे सर्वाधिक १५ नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, शिवसेनेचे ७ नगरसेवक बिनविरोध निवडले गेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीतही चुरस पाहायला मिळणार आहे. येथे ११५ नगरसेवक पदांसाठी एकूण ८५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे असून, त्यांनी ९७ उमेदवार उभे केले आहेत. भाजपने ९४, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने ९२ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी ७७ उमेदवार उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे ६२, एमआयएमचे ४८, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे २५, बसपाचे २१, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे ६ आणि तब्बल २६० अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
नाशिक महापालिका निवडणुकीतही अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झालं आहे. १२२ जागांसाठी ७२९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप सर्वाधिक ११८ जागांवर लढत असून, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून १०२ उमेदवार मैदानात आहेत. ठाकरे गटाची शिवसेना ७९, मनसे ३०, अजित पवार गटाची राष्ट्रवादी ४२, शरद पवार गटाची राष्ट्रवादी ३० आणि काँग्रेस २२ जागांवर लढत आहे. वंचितचे ५५ उमेदवार असून, अपक्ष व इतर मिळून एकूण २१२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आजपासून नाशिकमध्येही खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार असून, येथील निवडणूकही अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.