आजच्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाने काही ठिकाणी आरक्षणाचा टक्का मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे मान्य केले. अशा जागांचा वाटा सुमारे २२ टक्के असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली. त्यानंतर ओबीसी प्रतिनिधींनी आपली बाजू मांडली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला. या आदेशानुसार चालू असलेल्या निवडणूक कार्यक्रमात कोणताही हस्तक्षेप करण्यात येणार नाही. मात्र, आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्व संस्था अंतिम निर्णयाला बांधील असतील. या प्रकरणाचा पुढील टप्पा २१ जानेवारी २०२६ रोजी सुनावला जाईल. तोपर्यंत या संस्थांच्या निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट राहील.
आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे — जर पुढील सुनावणीत न्यायालयाचा निर्णय प्रतिकूल आला तर? सुप्रीम कोर्टाच्या आजच्या आदेशानुसार ज्या नगरपंचायती व नगरपरिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत, त्या ५० टक्के आरक्षण मर्यादा पाळूनच घ्याव्या लागतील. अत्यावश्यक, म्हणजेच अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा ओलांडली असेल, तर तिथे निवडणूक घेण्यास कोर्टाने तात्पुरती परवानगी दिली आहे. ५७ जागांवरील निवडणुकांना पूर्वीच मार्ग मोकळा झाला आहे, त्या संदर्भात कोणतीही स्थगिती नाही. मात्र त्या ५७ जागांचे अंतिम भविष्यसुद्धा २१ जानेवारीच्या निकालावर अवलंबून असेल. जर याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला गेला, तर या जागांवर विजयी झालेल्या सदस्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो, असे अॅड. देवदत्त पालोदकर यांनी स्पष्ट केले.
► आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ४० नगरपरिषद / नगरपालिका:
चिखलदरा, दर्यापूर, पांढरकवडा, यवतमाळ, बिलोली, धर्माबाद, हदगाव, उमरखेड, पाथरी, तुमसर, साकोली – सेंदुर्णावाडा, बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड, राजुरा, देसाईगंज, गडचिरोली, काटोल, दिघोरी (देवी), कामठी, कन्हान, खापा, उमरेड, कन्हान पिंपरी, रामटेक, पुलगाव, शिर्डी, पिंपळनेर, नवापूर, तळोदा, मालेगाव, पिंपळगाव, बसवत, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबक, वीट.
► आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या १७ नगरपंचायती:
धारणी, मालेगाव, धानकी, वाडा, भिसी, गोरेगाव, सालेकसा, बेसा, पिपला, भिवापूर, बिदगाय-तारोडी (खुर्द)-पंधुरणा, गोधनी (रेल्वे), फांद्री (कन्हान), महादला, मौदा, निलडोह, पेरखेडा, शिंदखेडा.
सुप्रीम कोर्टाच्या आजच्या अंतरिम आदेशामुळे निवडणूक कार्यक्रम अखंड सुरू राहणार असला तरी, आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या संस्थांसाठी आगामी सुनावणी निर्णायक ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष २१ जानेवारी २०२६ रोजीच्या निकालाकडे लागले आहे.