Source: TV 9 Marathi
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आघाडी आणि युती यांचं राजकीय समीकरण मांडलं जात आहे. मुंबई, पुणे, ठाणे अशा महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका हाच काळ गाठून होणार असल्यामुळे राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. अशा वेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आहे. ही संधी पाहून महायुतीने प्लॅन बी तयार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी महायुती रणनीती आखू लागली आहे.
ठाकरे बंधूंवर महायुतीकडून ‘नो रिस्क’ धोरण:
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांच्या राजकीय ताकदीत लक्षणीय वाढ होऊ शकते, हे लक्षात घेऊन महायुतीने ‘नो रिस्क’ नीती अवलंबली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीकडून एकत्रितपणे लढण्याचा विचार सुरू आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी आणि ठाकरे बंधूंच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी महायुतीनं संपूर्ण महाराष्ट्रातली महापालिकांची रणनिती मजबूत केली आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये युतीच्या ताकदीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होणार आहे.
मुंबईसाठी खास रणनिती:
महायुतीला ठाऊक आहे की, ठाकरे बंधू एकत्र आले, तर त्यांचा सर्वात मोठा प्रभाव मुंबई महानगरपालिकेवर असेल. त्यामुळे, मुंबई जिंकण्यासाठी एक सुसूत्र योजना तयार केली जात आहे. मुंबईच्या राजकारणात खोलवर समज असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडेच जबाबदारी देण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले आमदार, नगरसेवक, मंडळ पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत.
ठाकरेंच्या कारभारावर हल्लाबोल:
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्या काळात झालेल्या प्रशासनातील त्रुटी, भ्रष्टाचार आणि निर्णयक्षमतेतील कमतरता या बाबी आता मतदारांसमोर आणण्याची तयारी महायुतीने केली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डवर लक्ष केंद्रित करत, त्या ठिकाणी कार्यरत आमदारांकडे जवाबदारी सोपवली जाणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे शिवसेनेचा कारभार उजेडात आणून मतदारांचं मत परावर्तीत करणे.
सणासुदीचा काळ साधत प्रचार:
सध्या गणेशोत्सव, गोविंदा यांसारख्या सणांचा काळ सुरू झाला आहे. या काळात मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात. त्यामुळेच महायुतीने याच काळात प्रचारासाठी विशेष मोहिम आखली आहे. कोकणातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी गणेशोत्सव काळात मोफत एसटी बसेस, ट्रेन सेवा देण्याचं नियोजन महायुतीच्या नेत्यांकडून केलं जात आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, गोविंदा पथकं यांच्यासोबत संवाद साधून, त्यांना थेट मोहिमेत सामील करण्याचाही मानस आहे.
अश्या प्रकारे महायुतीनं आखली ‘प्लॅन बी’ ची रणनीती.