Source: News 18 Marathi
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सज्जता सुरू केली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासह पदाधिकाऱ्यांच्या बैठका सध्या जोरात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन महत्त्वाचे निर्देश दिले. या बैठकीदरम्यान त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोबत होऊ शकणाऱ्या युतीविषयी देखील भूमिका स्पष्ट केली.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत राज ठाकरे यांनी सांगितले की, निवडणुका आता जवळ आहेत, त्यामुळे कोणतेही गटबाजीचे किंवा मतभेदाचे प्रश्न निर्माण करू नका. सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ पद्धतीने कामाला लागा, असा स्पष्ट संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. मराठी अस्मिता आणि भाषेचा मुद्दा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले. मात्र, हिंदी भाषेचा द्वेष केला जात असल्याचा गैरसमज दूर करा, असेही त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बूथ पातळीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. मतदार यादीची तपासणी, नावांची पुनर्पडताळणी आणि डुप्लिकेट मतदार ओळखणे यासाठी विशेष मोहिम राबवावी, असे आदेश त्यांनी दिले. मतदार यादीमध्ये अचूकता आणणे ही निवडणुकीसाठी अतिशय आवश्यक गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
20 वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र…
राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना उद्देशून एक भावनिक आणि महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. "जर आम्ही दोन भाऊ वीस वर्षांनंतर एका मंचावर एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही तुमच्यातील हेवेदावे का ठेवताय?" असा थेट सवाल करत त्यांनी संघटनेतील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षातील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे.
यासोबतच त्यांनी जुन्या निष्क्रीय कार्यकर्त्यांनाही पुन्हा संघटनेत सक्रीय करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही कारणाने दूर गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा, संवाद साधा आणि त्यांना पुन्हा मनसेच्या कार्यात सामील करून घ्या, अशी सूचना त्यांनी केली. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही एक अत्यंत गरजेची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
युतीचं काय?
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात होणाऱ्या संभाव्य युतीबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांना उत्तर देताना राज ठाकरे यांनी या विषयावर थोडक्यात भाष्य केले. "युतीचा निर्णय माझ्यावर सोडा, योग्य वेळी मी त्याची घोषणा करीन," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या विधानावरून स्पष्ट होते की, युतीसंदर्भात निर्णय अजून घेतलेला नाही, पण चर्चेचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गट एकत्र येतील का याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.