चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा विधानसभा मतदारसंघ यापूर्वीपासूनच तगड्या चुरशीच्या लढतीसाठी ओळखला जातो. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांनंतर या मतदारसंघातील निकालाचे महत्त्व आणखी वाढले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष धोटे विजयी झाले होते. त्यांना ६० हजार २२८ मते मिळाली होती. तर वामनराव चटप यांना ५७ हजार ७२७ मते आणि भाजपचे संजय धोटे यांना ५१ हजार ०५१ मते मिळाली. यावेळी काँग्रेसला केवळ २,५०९ मतांच्या फरकाने विजय मिळाला होता.
मात्र २०२४ मध्ये चित्र बदललं. यावेळी भाजपचे देवराव भोंगळे यांनी विजय मिळवला. त्यांनी ७२ हजार ८८२ मते मिळवत आघाडी घेतली. काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांना ६९ हजार ८२८ मते मिळाली, तर स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप ५५ हजार ०९० मतांसह तिसऱ्या स्थानी राहिले. भाजपला येथे अवघ्या ३,०५४ मतांच्या फरकाने विजय मिळाला.
राजुरामधील या टोकाच्या लढतीत भाजपने थोडक्यात आघाडी घेतली असली, तरी राहुल गांधींनी केलेल्या बोगस मतदारांच्या आरोपांमुळे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. एवढ्या अल्प मताधिक्याने निकाल लागलेल्या मतदारसंघात जर खरोखरच ६,८५० बोगस नावे असल्याचे सिद्ध झाले, तर संपूर्ण निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.
राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेत यापूर्वी बोगस मतदार कसे जोडले जातात याबाबत खुलासा केला होता. यावेळी त्यांनी थेट मतदारांची नावे काढून टाकण्याचा प्रकार उघड केला. हे दोन वेगवेगळे प्रकार एकत्र पाहिले तर, निवडणुकीच्या प्रक्रियेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो, असे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या मतदारांना टार्गेट करून मतदारयादीतील फेरबदल केला जात आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
राजुरामध्ये अतिशय कमी मतांच्या फरकाने निकाल लागला असल्यामुळे राहुल गांधींचा आरोप कितपत गंभीर आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने जरी विजय मिळवला असला, तरी आता राजकीय वातावरणात नव्या आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे.