मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून, त्यांच्या या दौऱ्यात राज्याच्या राजकीय आणि विकासात्मक पातळीवर काही महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब झाल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. महायुती सरकारच्या आगामी निवडणूक रणनीतीबाबत दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढायचं की स्वबळावर जाण्याचं, यावर देखील निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे.
डिसेंबरपूर्वी ‘मिनी विधानसभा’ची शक्यता
दिल्लीतील या बैठकीत विधानसभेच्या ‘मिनी निवडणुका’ घेण्यावरही चर्चा झाल्याचे कळते. या निवडणुका महायुतीसाठी एक लिटमस टेस्ट मानल्या जात असून, विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं यश पुनरावृत्त करता येईल का, हेच यामधून स्पष्ट होणार आहे.
महापालिकांत कुठे महायुती तर कुठे स्वबळ?
दिल्लीतील या बैठकीत विशेषतः मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुणे आणि ठाण्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. महायुतीतील ज्या पक्षांचा ज्या महापालिकेत प्रभाव आहे, त्यांनी त्या ठिकाणी स्वबळावर लढावे, असा सूर उमटत आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळेल, अशीही चर्चा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास सत्ता समीकरण जुळवण्यासाठी निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे घटकपक्ष एकत्र येऊ शकतात, असेही सूत्रांनी नमूद केले आहे.
ठाणे आणि पुण्यातील राजकीय गणित
ठाण्यात शिंदे गट सध्या प्रबळ स्थितीत असून, भाजपनेही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. पुण्यात भाजपचे वर्चस्व असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी भाजपची थेट लढत अपेक्षित आहे. शिंदे गटाचा पुण्यात तुलनेने प्रभाव कमी असल्याने इथे महायुतीपेक्षा स्वबळाची शक्यता जास्त आहे. मात्र, काही ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल, असेही संकेत आहेत.
मुंबई महापालिकेबाबत निर्णय अद्याप बाकी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे. शिंदे गट 100 पेक्षा जास्त जागांवर लढण्याचा आग्रह धरत आहे, तर भाजप 227 पैकी 150 पेक्षा अधिक जागांवर दावा सांगत आहे. त्यामुळे जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्यासाठी शिंदे गट आणि भाजप मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्नशील आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे आणखी रंगतील, हे निश्चित मानले जात आहे