2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची 25 वर्षांची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. या धाडसी निर्णयातून महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अडीच वर्ष टिकलेलं हे सरकार 2022 मध्ये कोसळलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाही फोडण्यात आलं. आज महाविकास आघाडीत काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक गट एवढेच उरले आहेत.
लोकसभेत काँग्रेसच्या 13, शिवसेनेच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 8 जागा आघाडीनं मिळवल्या होत्या. पण फक्त काही महिन्यांनी झालेल्या विधानसभेत प्रचारातील मतभेद, जागावाटपातील गोंधळ आणि संघटनातील कमकुवतपणा यामुळे आघाडीला पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.
मनसेकडून नव्या समीकरणांची आशा
उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये घेतलेला निर्णय राजकीय धैर्याचा मानला जातो. भाजपसारख्या ताकदवान पक्षाविरोधात जाण्याचा धोका त्यांनी स्वीकारला. काँग्रेससोबत जाणं हे त्यांच्यासाठी तितकंच आव्हानात्मक होतं. पण त्या काळात ठाकरेंनी केवळ सत्तेसाठीच नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या मुद्यांवरही ठाम भूमिका घेतली. गुजरात दंगलीतील बळी ठरलेल्या बिल्कीस बानो प्रकरणी त्यांनी भाजपवर कठोर टीका केली. त्यामुळे त्यांची प्रतिमा काँग्रेस-समर्थक झाली, तरी त्यांचा मूळ हिंदुत्ववादी चेहरा कायम राहिला.
दुसरीकडे, राज ठाकरे यांची राजकीय भूमिका सतत बदलत राहिली आहे. भोंगे, परप्रांतीय, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विषयांवरून त्यांची ठाम भूमिका असते, मात्र राजकीयदृष्ट्या सातत्य दिसून येत नाही. 2009 मध्ये 13 आमदार निवडून आल्यावर मनसेला मोठी झेप मिळाली होती. मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये मोठं प्रतिनिधित्व मिळालं होतं. पण 2017 नंतर पक्षाची घसरण सुरू झाली. आज संघटनं विस्कटली असून, अलीकडील निवडणुकांत मनसेला केवळ 1.8 टक्के मते मिळाली.
यामुळे मनसेला नव्याने संजीवनी देण्यासाठी उद्धव ठाकरेंची साथ महत्त्वाची ठरू शकते. मात्र या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना समान मिळेल का, याबाबत अजूनही साशंकता आहे.
समान धागा आणि आगामी प्रश्न
महाविकास आघाडीप्रमाणेच उद्धव आणि राज ठाकरे युतीही अपरिहार्यतेतून जन्माला येतेय, असं दिसतं. हिंदी सक्तीला विरोध करताना दोघेही एका मंचावर आले होते. पण भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या तीव्र टीकेला राज ठाकरे कितपत मान्यता देतील, हा मोठा प्रश्न आहे.
एका बाजूला लोकसभेत भाजपला पाठिंबा जाहीर करणारे राज ठाकरे, आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या डावपेचांना रोखण्यासाठी झगडणारे उद्धव ठाकरे – हे दोघे एकत्र आल्यास पुढील काळात त्यांच्या समान भूमिकेचं चित्रण कसं होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.